Friday, March 18, 2022

श्री लक्ष्मी मल्लमर्दन वज्र्यलेप एक अनुभव:

आपल्या भारताला परंपरा आणि संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभला आहे. हिंदू धर्माची पाळेमुळे एवढी खोलवर रुजली आहेत की कितीही जरी आधुनिक विचारकर्ते असले तरी आपले मूळगाव, आपले कुलदैवत, आपले घरदार,आपले रीतिरिवाज मानणारी आणि आयुष्यात एकदा का होईना आपल्या गावच्या देवाच्या दर्शनाला जाण्याचा ही मंडळी प्रयत्न करतात. असाच एक देव, रत्नागिरी जिल्ह्यातील, चिपळूण तालुक्यातील वीर या गावी आहे. तिन्ही बाजूने डोंगर, डोंगरातून वाहणारा बारमाही धबधबा, सतत खळखळाट करत वहात असणारी नदी, अशा निसर्गरम्य देवपाट ह्या वीरच्या विभागात श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवतेचे भले मोठे मंदिर आहे आणि त्यामध्ये विराजमान झालेला ६ फूट उंच आणि 4.5 फूट रुंद असा हा देव सुमारे 350 वर्षापूर्वी वीर जवळील खाडीत एका नावाड्याला सापडला तो त्याने वीर मधील ब्राह्मण वर्गाला नेऊन दाखवला. बरेच दिवस खाडीत राहिल्यामुळे त्याची आधीच झीज झाली होती. तो खाडीतून बाहेर काढून त्याकाळी त्याची विधिवत पूजा अर्चा होऊन देवपाट येथे एक मंदिर बांधले गेले त्यात तो स्थानापन्न झाला. सध्याचे मंदिर 1940 साली बांधले असून ते अतिशय भव्य आणि डौलदार आहे. भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत म्हणतात "परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।4.8।।" अगदी तसाच भाव असलेला कुमारावस्थेतील श्रीकृष्ण आठ मल्लांना मारत आहे असे चित्र या मूर्तीत आहे. कृष्णाचा मामा, मथुरेचा राजा कंस, त्याचा भाऊ अक्रूड याला, दोन्ही भाचे श्रीकृष्ण आणि बलराम याना वृंदावनातून मथुरेमध्ये घेऊन यायची आज्ञा देतो. त्या प्रमाणे अक्रूड त्यांना घेऊन मथुरेत येतो. रस्त्यामध्ये एका शंकराच्या मंदिरात एक शिवधनुष्य असते ते श्रीकृष्ण विनासायास उचलतो आणि त्याठिकाणी श्रीकृष्णाची ताकद ओळखू येते. मथुरेमध्ये एका पटांगणात कंसाचे बलदंड मल्ल चाणुर आणि मुस्टिक हे एक प्रदर्शनिय कुस्ती सामने खेळत असतात. कंसाने ठरवल्याप्रमाणे ते कृष्णाला भडकवण्यासाठी आव्हान देतात जेणेकरून श्रीकृष्ण आणि बलराम कुस्ती खेळायला आले की त्या कुमाराना लोळवून त्यांची हत्या करायची असा कंसाचा डाव होता. पण प्रत्यक्षात या दोन्ही मल्लाना ते दोन्ही भाऊ ठार मारतात आणि पुढे कंस आपल्या आठ भावांना श्रीकृष्णावर चाल करायला सांगतो तर त्या आठही भावांचा आणि कंसाचा श्रीकृष्ण वध करतो. त्यानंतर मथुरेच्या गादीवर मूळ राजा उग्रसेन याला बसवून श्रीकृष्ण आणि बलराम तेथून निघतात अशी ती अख्यायिका आहे. या मूर्तीची गेल्या 350 वर्षात वातावरणामुळे आणि अभिषेक वगैरे मुळे आणखीन झीज होऊन त्याचे मूळ स्वरूप केव्हाच नष्ट होऊ लागले होते. अशा वेळी वज्र्यलेप करून मूर्ती परत मूळ अवस्थेत आणण्याचा प्रयत्न तज्ज्ञांच्या मार्फत करता येतो. पूर्वी वज्र्यलेप करताना नैसर्गिक साधन सामग्री वापरली जायची पण आता नवनवीन रसायने बाजारात उपलब्ध आहे ती आणि दगडाची बारीक पावडर वापरून हा केला जातो. कोणी सांगेल सुवर्ण भसम वापरतात, मोत्याची पावडर वापरतात ते सर्व खोटे आहे. आमच्या देवाची मूर्ती अतिशय मोठी आणि कलाकुसरीच्या दृष्टीने किचकट असल्यामुळे कारागीर निवडणे एक मोठे आव्हान होते. या बाबतीत पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये असलेल्या म्युझियम विभाग, तसेच आर्किलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी यातील तज्ञ उपलब्ध आहेत पण या विषयात या विभागांची ऑफिशियल सेवा उपलब्ध आहे असे कळले नाही. चांगला कारागीर शोधण्यासाठी आम्ही तीन चार कारागिरांची कामे प्रत्यक्ष जाऊन बघितली. आपल्या बजेटमधील चांगला कारागीर शोधणे एक मोठे आव्हान असते. आमचे बजेट फार कमी होते म्हणून आम्ही कोल्हापूर येथील श्री दिपकराव ओतारी याना हे काम दिले. (त्यांचा मोबाईल नंबर +91 97624 45200). ओतारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात बरीच आणि चांगली कामे केल्याचे संदर्भ आम्हाला मिळाले ती कामे आम्ही स्वतः जाऊन बघितली. त्यांनी आणि त्यांचा मुलगा योगेश ओतारी यांनी आमचे काम फक्त 2 महिन्यात वीर येथे राहून पूर्ण केले. अतिशय एकाग्रतेने कलात्मक काम करणारी, मितभाषी, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणारी व्यक्ती म्हणून मी त्यांची नक्की शिफारस करेन. त्यांच्या कामाची गुणवत्ता हे दोन फोटोच देतील. एक जुना फोटो आणि एक नवीन फोटो. माधव भोळे 9819479791

No comments:

Post a Comment