Monday, March 14, 2022

डॉ केतकर ज्ञानकोश काय प्रकरण आहे हे? देवरूखे ब्राह्मण ज्ञातीशी त्यांचा काय संघर्ष होता?

डॉ केतकर ज्ञानकोश काय प्रकरण आहे हे? देवरूखे ब्राह्मण ज्ञातीशी त्यांचा काय संघर्ष होता? पुणे येथील ईतिहास संशोधक मंडळाचे प्रमुख इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ( वि. का. राजवाडे) यानी मंडळाच्या एका सभेत एक लेख प्रसिद्ध केला त्यामध्ये देवरुखे ब्राह्मण यांचे बद्दल अपमान जनक माहिती दिली त्यापैकी एक म्हणजे "साताऱ्या जवळ देवराष्ट्र नावाचे एक राज्य होते त्या युद्धात तेथील राजा हरला", त्या हरलेल्या राजाची प्रजा जी कोकणात आली ते देवर्षी म्हणजे पुढे झालेले देवरूखे". असे म्हटले होते. प्रत्यक्षात विजयनगर साम्राज्य जे विजयनगर पासून ते पश्चिम अरबीसमुद्र असलेल्या कोकणापर्यंत पसरले होते तेथील काही भाग मूळ आदिवासी मंडळींचे होते, त्यांना शेती करणे माहीत नव्हते. त्या मंडळींना शेती शिकवून त्यांचेकडून महसूल तयार करून तो राजापर्यंत पोहीचवण्यासाठी जी मंडळी कर्नाटकातून कोकण विभागात आली ते देवरूखे. रुखे म्हणजे कानडी मध्ये रूप. देव रुखे म्हणजे देवाचे रूप. ही मंडळी जी कोकणातील जमिनीवर राजाचे प्रतिनिधी म्हणून काम करू लागली त्यातून खोतकी निर्माण झाली. खोत आणि इनामदार असे दोन मंडळी राज्याला महसूल भरू लागली आणि पडीक जमिनीमधून राजाचे उत्पन्न वाढले. सत्ता बदलानंतर हे खोत आदिलशाही चे काम करू लागले. आमच्या वीर गावातील आलेल्या मूळ पुरुषांची आडनावे देशप्रभु अशी होती असे म्हणतात. पुढे लोकांनी आपापल्या गावांप्रमाणे नावे बदलली. कोकणात सर्व ठिकाणी गावकीच्या देवळात पालखीच्या आधी रूपे लावतात त्यावेळी राजसत्ता आणि पूर्व सत्ता असे दोन तट असतात. पूर्व सत्ता म्हणजे मूल निवासी आणि राज सत्ता म्हणजे ही खोत मंडळी, राज्याचे प्रतिनिधी. पूर्वीच्या काळी राज सत्तेच्या हुकुमाशिवाय देवाला रूपे लावून पालखी देवळा बाहेर पडत नसे अशी प्रथा होती आणि अजूनही काही गावात आहे. दुसरा अपमान म्हणजे "देवरूखे ही मागासलेले ज्ञाती असून ते तापट स्वभावाचे आहेत असे त्यात लिहिले होते". हे प्रतिथयश देवरुख्याना मान्य नव्हते. त्याकाळी भिकाजी मोरेश्वर मादुसकर या शिक्षकाने पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाच्या त्याच सभेत राजवाडयानच्या या लिखाणावर आक्षेप घेतला. राजवाड्यांनि त्यांना पुरावे ध्या मग हे लिखाण बदलतो असे लिहून प्रकरण दाबून टाकले. राजवाड्यांच्या दरारा जास्त होता म्हणून कोणी काही बोलले नाही. पुढे हे प्रकरण भिकाजी मोरेश्वर मादुसकरानी त्या काळचे प्रतिथीयश व्यक्ती रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर जे कलकत्ता येथे इंग्रजी आणि संस्कृतचे प्राध्यापक आणि पुढे लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्य ग्रंथाचे प्रूफ रीडर आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी ( 1907 च्या सुरत काँग्रेस मध्ये झालेल्या जहाल विरुद्ध मवाळ गदारोळात टिळकांना सुरक्षित बाहेर काढले त्या ग्रुप पैकी एक) याना सांगितली. त्यांनी संशोधन करून "चितळे भट्ट प्रकरण" हे पुस्तक लिहिले त्यामध्ये रत्नागिरी जवळील बसनी गावच्या चितळे नावाच्या एका धनाढ्य ब्राह्मणाने भानू तेरेदेसाई नावाच्या शिक्षित ब्राहणाचा क्षुल्लक कारणासाठी अपमान करून, देवरूखे ब्राह्मणांना कसे बहिष्कृत केले. या बाबतीत त्यावेळच्या देवरूखे मंडळींनी चितळे यांचे विरुद्ध इतर धर्म पीठे आणि काशी चा मुक्ती मंडप येथे दाद मिळवून निर्णयाची पत्रे मिळवून देवरूखे कसे दोषमुक्त आहेत हे सिद्ध केले आणि आणि तसेच चितळे यांच्या पणतू ने लेखी माफी मागून हे प्रकरण मिटवले. या सर्वांची कागदपत्रे मिळवून या सर्वांची टिप्पणी या पुस्तकात दिली. पुढे डॉ केतकरांनी ज्ञान कोष लिहिताना इतिहास संशोधन मंडळाचा लेख आधार मानून तोच मजकूर जसाच्या तसा छापला. त्यावेळी सुद्धा देवरूखे मंडळी केतकरांकडे गेली. त्यांनी पुरावा मागीतला तसेच देवरूखे ब्राह्मण महासभा किंवा परिषदेचा मजकूर बदलावा आणि नवीन मजकूर काय असावा म्हणून ठराव मागितला. तो देण्यास खूप वेळ लागला मधल्या काळात देवरूख्यांच्या तीन परिषदा झाल्या पण ठरावाच्या मसुध्यावर एकमत होत नव्हते ( पूर्वी परिषदा ज्ञातीच्या प्रगतीच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी घेतल्या जायच्या). हा पत्रसंघर्ष सुरूच होता. पुढे मराठी विश्वकोशा मध्ये हा मजकूर सुधारला गेला. अशी आहे देवरूख्यांबद्दल ची ज्ञानकोषाची कहाणी. या बाबतीत "आम्ही कोण आपले कोण" हे दामूअण्णा तेरेदेसाई, गोवंडी, तसेच " देवरूखे ब्राह्मणांचा इतिहास" ( देवरूखे मित्र मंडळ प्रकाशक) यामध्ये सविस्तर माहिती आपणास मिळेल. त्यापैकी देवरूखे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाची एक कॉपी मी स्वतः मित्र मंडळाचे वतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका पॉली ओ हॅनलोन ज्या पूर्व आशिया इतिहास विभागाच्या प्रमुख होत्या त्या महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि त्यांच्या चाली रीती या वर संशोधन करीत होत्या त्यांना पाठवली. त्यांना वाजपेयी सरकारकडून ग्रांट प्राप्त झाली होती. पुण्यात आणि डेक्कन कॉलेज पुणे येथे काही काळ संशोधन केल्यामुळे त्यांना असखलीत मराठी येत होते. ऑक्सफर्ड विध्यापिठाच्या लायब्ररीत असलेले "देवरूखे ब्राह्मणाबद्दल शास्त्र संमत विचार - समज गैरसमज" हे विष्णू शास्त्री पंडित ( मदन मोहन मालवीय यांचे सहकारी) यांच्या पुस्तकाची कॉपी त्यांनी मला इमेल ने पाठवून दिली हे विशेष. माधव भोळे

No comments:

Post a Comment