Saturday, July 20, 2024

पाक कला आणि त्याचे महत्व भाग १

 पाक कला आणि त्याचे महत्व भाग १

पूर्वी जयू पटवर्धन हा मुंबईतील दादर येथील एक उत्तम कॅटरर होता. त्याचे एक वैशिष्ठ म्हणजे तो जेवणाचे सर्व मसाले ताजे म्हणजे आयत्यावेळी बनवत असे. त्यामुळे जेवणाला एक नैसर्गिक सुगंध येऊन जेवण चवदार होत असे. मी त्याचे जेवण जेवलो आहे.


एकदा जेव्हा कै. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती झाले तेव्हा त्यावेळचे पंतप्रधान कै. अटल बिहारी बाजपेयी त्यांना गमतीत म्हणाले "अरे जोशी साहब, अब आप सभापती बन गये हो तो हम सांसदों को कुछ मराठी मेजवानी चाहिये. पंतांनी ती रास्त मागणी लगेचच उचलून धरली. 

पंतांची स्वतःची मुंबईत अनेक ५ स्टार हॉटेल्स, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट असताना सुद्धा त्यांनी जयू पटवर्धनला दिल्ली येथे बोलावून सर्व व्यवस्था करायला सांगितली आणि ती जबाबदारी जयूने अतिशय उत्तम पार पाडली.

जयूचे यां विषयात एवढे नांव होते की आमचा एक व्यासंगी देवरुखे गृहस्थ बँकेत उच्च पदावर नोकरी करत असताना सुद्धा, दर रविवारी आणि सुटीला तो जयू कडे कामाला जातं असे, कारण त्यामुळे काम शिकता येते. आता त्याने स्वतःचे कॅटरिंग सुरू केले आहे. 

आता जयू यां जगात नाही असे मी ऐकले. त्यांच्या एवढे नांव पुरवी नाना कुलकर्णी, धामणसे यांचे होते. 

एक घास तोंडात घातला की पुढचा घास लगेच घ्यायची उत्सुकता जेव्हा लागतें तेच खरे जेवण. बाकी सर्व उदर भरण. अर्थात आमची आई उत्तम जेवण करायची म्हणून आम्हाला ती चटक लागली.


माधव भोळे 


पाककला आणि त्याचे महत्व भाग २

 पाककला आणि त्याचे महत्व भाग २

काल मी पाककला आणि त्याचे महत्व भाग १ हा लेख लिहिला होता त्याला बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला. काल वाचता वाचता असे लक्षात आले की अनंत अंबानी च्या लग्नामध्ये शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी अंबानी परिवाराने पेरू ह्या दक्षिण अमेरिकी देशातील सुप्रसिद्ध आचारी Virgilio Martinez, ज्याचे "सेंट्रल" ह्या नांवाचे उपहारगृह सन २०२३ मध्ये जगातील सर्वोत्तम उपहारगृह म्हणून नोंदवले गेले, त्याला ह्या कामासाठी प्रमुख आचारी म्हणून नेमले होते.


भारतासारख्या मुख्यत्वे शाकाहारी देशात अंबानींना एकही सर्वोत्तम शाकाहारी आचारी मिळू नये याचे थोडे आश्चर्य वाटले आणि विचार करायला सुरवात केली. 


आपल्या मराठी भोजन किंवा पदार्थांबद्धल बोलायचे झाले तर आजकाल आपली मराठी किंवा गुजराती शाकाहारी मंडळी उपहरगृहांमध्ये दक्षिणात्य डोसा, इडली, सांबार किंवा उत्तरेकडील सर्व प्रकारचे पराठा, बिर्याणी, पुलाव, पनीर, मिश्रित भाज्या किंवा वेस्टर्न पिझा, बर्गर, मोमोझ, पास्ता आवडीने खातात पण यां विरुद्ध अमराठी मंडळी मराठी हॉटेल मध्ये जाऊन वडापाव, मिसळ सोडले तर इतर मराठी पदार्थ खातात का? कारण आपण इतर अनेक चांगले मराठी पदार्थ मराठी हॉटेलमध्ये ठेवतंच नाही. मराठी हॉटेलची संख्या सुद्धा कमी झालेली आहे. शिवाय आपण वर्षानुवर्षे तेच तेच पदार्थ बनवत आहोत. त्यात काही व्हरायटी किंवा व्हेरीयेशन केले आहे का? 


पूर्वी डोस्या मध्ये फक्त साधा डोसा, मसाला डोसा, उत्तपा एव्हडेच मिळत होते. आता डोसा, आणि उत्तपा च्या कमीत कमी २५ तें ३० व्हरायटी "डोसा प्लाझा" हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये मैसूर मसाला, चायनीज डोसा, मशरूम डोसा, नूडल्स डोसा अशा प्रकारचे डोसे एवढेच काय पण एका ठिकाणी आयस्क्रीम डोसा पण बघितला. 


पराठ्या मध्ये कमीतमी १८ प्रकारचे पराठे जसे की आलू पराठा, मुली पराठा, गाजर पराठा, गोबी पराठा, मग आलू गोभी पराठा, मिक्स पराठा. तुम्ही कल्पना ही करू शकणार नाही अशी कॉमबिनेशन ही मंडळी तयार करतात आणि विकतात सुद्धा. 


अहमदाबाद च्या इंदुबेन खाकरावला यांच्याकडे १३६ प्रकारचे खाकरा, १९ प्रकारची लोणची, ९ प्रकारच्या भाकऱ्या, ८ प्रकारचे पापड असे पदार्थ विकायला आहेत. ठेपल्याचे पदार्थ पुन्हा वेगळेच.

मी म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे बिर्याणी जॉईंट तर सर्वत्र जोरात चालतात पण आमचा मसाले भात आम्ही तोच ठेवला आहे. त्यात पनीर, मशरूम किंवा अन्य काही पदार्थ घालून त्याची लज्जत वाढवू शकतो का?


आपण अजून झुणका भाकर हे गरिबांचे खाणे म्हणून बघतो पण जर ज्वारी, बाजरी, तांदूळ किंवा नाचणी ची भाकरी यांमध्ये थोडे व्हेरियेशन करून जर त्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग केले तर पिझाच्या आक्रमाणाला आपण नक्कीच तोंड देऊ शकतो.


मिसळ मध्ये तर कमीतकमी ६ तें ८ प्रकरच्या मिसळ ठेवणे शक्य आहे. त्यातील ३ तरी आलटून पालटून ठेवायला हव्यात.


जी कथा हॉटेल्स ची तीच मराठी लग्नामधील कॅटरिंग ची. पूर्वी विवाहात आवर्जून मराठी पदार्थ ठेवत. आता एकजाद सर्व पंजाबी पदार्थ असतात. जर काजू घालून गरम मसाले भात, भरली तोंडली, आलू पालक किंवा अळू, किंवा सुंदर पातळ भाजी ठेवली, पंचामृत, मठ्ठा, तोंडी लावणे काकडी किंवा टोमॅटो काकडी कोशिबिरी, पुरणपोळी, डाळिंबी उसळ, पोळी ठेवली तर लोक आवडीने खाणार नाहीत का? अर्थात याही पेक्षा चांगला मराठी मेनू असू शकतो, पण कोणी म्हणतात तें हल्लीच्या भाषेत डाऊन मार्केट समजले जाईल?


लोकांना व्हरायटी पाहिजे, नावीन्य पाहिजे. आणि तें मिळाले नाही तर व्यवसाय बंदच होणार.


आहो आपल्या पूर्वजांनी सुद्धा ताकाची कढी पासून पालक कढी, गोळा घालून कढी अशा वरायटी बनवल्या होत्याच की. पण आपल्या आताच्या पिढीला व्यवसायात रिस्क घ्यायची नाही. थोडे एक्सपरिमेन्ट करायचा नाही मग काय होणार. हळू हळू मराठी हॉटेल बंदच पडणार. कालच गिरगांव मध्ये गेलो होतो. सुमारे १०० वर्षांपूर्वी सुरू झालेले वेलणकर उपहार गृह बंद दिसलें. यां आधी सुद्धा दोन तीन वेळा गेलो तेव्हा बंद दिसलें. 


माधव भोळे

Thursday, July 7, 2022

Letter to Madhav Chitale on Devruke

आज ग्रुप चे एक सदस्य श्री नितीनराव कराडकर यांनी एक लेख माझ्याकडे पाठवला त्यात देवरूख्यांबद्दल चुकीची माहिती https://www.thinkmaharashtra.com/ब्राह्मण-कोण/ या वेबसाईटवर दिली जात आहे. त्यावर त्या लेखकाला मी खालील पत्र देऊ इच्छितो. आपली प्रतिक्रिया कळवा. *** श्री माधव चितळे नमस्कार, मी माधव भोळे आपण https://www.thinkmaharashtra.com/ब्राह्मण-कोण/ ह्या वेबसाईटवर विनाकारण देवरूखे आणि चित्तपावन ब्राह्मण यांच्यातील सुमारे 1400 सालातील वितुष्ट यावर अर्धवट माहितीच्या आधारे लेख लिहिला आहेत. सदर प्रकरणाची खरी माहिती हवी असेल तर कै लोकमान्य टिळकांचे सहकारी असलेल्या कै. रामकृष्ण सदाशिव पिंम्पुटकर ह्यांनी लिहिलेल्या "चितळे भट्ट प्रकरण" ह्या पुस्तकात मिळेल. ते मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, नायगाव येथे उपलब्ध आहे असे कळते. तसेच देवरूखे मित्र मंडळ मुंबई यांनी "देवरूखे ब्राह्मणांचा इतिहास" या संपादित केलेल्या सुद्धा मिळेल. त्याच बरोबर त्यावेळच्या चित्तपावन मंडळींनी देवरूखे मंडळींना वाळीत टाकल्याच्या निषेधार्थ आणि दाद मागण्यासाठी महाराष्ट्रातील धर्म पीठे आणि काशी येथील मुक्ती मंडपातील निर्णय पत्रे सुद्धा या इतिहासाच्या पुस्तकात उद्धृत केली असून पुढे चितळ्यानच्या पणतू ने लेखी माफी मागून हे प्रकरण मिटवले असून सलोखा राखण्याचा प्रयत्न केला होता. या बाबतींत थोडक्यात माहिती अशी. रत्नागिरी जवळ बसनी नावाच्या गावात चितळे नावाचे एक सद्गृहस्थ आपल्या आणि गावच्या सोयीसाठी एक तलाव बांधत होते. त्यावेळी रस्त्याने आजूबाजूच्या जाणाऱ्या वाट सरूनकडून सुद्धा तलाव उपसण्यासाठी शारीरिक मदत मागत होते. त्यावेळी भानू तेरे हे गडनरळ विभागात राहणारे शास्त्रीबुवा आपल्या सहकाऱ्यांसह त्या वाटेने जात होते. चितळे नि तीच विनंती भानू तेरे याना केली. भानू तेरे विद्वान शास्त्री असल्यामुळे त्याकाळच्या रितीनुसार त्यांनी चितळे याना सांगितले की माझ्या बुद्धीला शोभेल असे काम सांगा हे काम मी करणार नाही. त्यावरून या दोघांमध्ये संघर्ष झाला आणि त्याचे रूपांतर पुढे देवरूखे विरुद्ध चित्तपावन या वादात होऊन विद्वान देवरूखे मंडळींना व्यावसायिक दृष्ट्या नामोहरम करण्यात होऊन त्याचा देवरूख्यांच्या अनेक पिढ्याना संघर्ष करावा लागला. दोन हेकेखोर मंडळींमुळे दोन समाजात वितुष्ट आले ही कथा आहे. तरी आपण आपल्या वरील लेखात सुधारणा करावी ही विनंती. या उपर याची शहानिशा आपण कराल आणि या पुढे योग्य ती माहिती मिळवून ती प्रसारित कराल अशी आशा व्यक्त करतो. आण माधव भोळे 9819479791

Wednesday, April 27, 2022

अखिल देवरूखे ब्राह्मण पतिनिधी परिषदेची छायाचित्रे

11.04.2022 श्री रमेश महाजन, माधवाश्रम, गिरगाव, मुंबई याना कोण ओळखत नाही? गेले 65 वर्ष या ना त्या कारणाने त्यांनी स्वतः आणि गेले 100 वर्ष त्यांच्या माधवाश्रम ह्या संस्थेने देवरूख्यांच्या वेगवेगळ्या संस्थांना लागेल ते सहाय्य जमेल त्या पद्धतीने केले आहे. त्यांच्या या औदार्या बद्दल अनेक लेख सुद्धा पूर्वी प्रकाशित सुद्धा झाले आहेत. पण आजचा हा छोटासा लेख एका खास औदर्याबद्दल आहे. देवरूख्यांच्या इतिहासात घडलेल्या एका महत्त्वाच्या टप्प्याची छायाचित्रे त्यांना अचानक त्यांचे निवस्थानी सापडली आणि त्यांच्या उरात भावनांचा हलकल्लोळ उठला. दिनांक 22 ते 24 मे 1927 रोजी श्री महादेव बजाजी वीरकर, बीए, एल एल बी, वकील सुप्रीम कोर्ट, मूळ गाव महाड, मुंबई रहिवासी, यांच्या अध्यक्षतेखाली माधवाश्रम येथे झालेल्या अखिल देवरूखे ब्राह्मण पतिनिधी परिषदेची ांना अचानक सापडली. आणि त्यांनी फोनाफोनी सुरू केली. ही अस्सल दुर्मिळ छायाचित्रे कोठेतरी जपून ठेवली जावीत ही त्या मागची ईच्छा. त्यांचे परममित्र श्री रमेश निंबकर यांनी माझे नाव घेतले आणि मला सम्पर्क करण्यास सांगितले. मी त्यांना सांगितले की ह्या छायाचित्रांची जागा स्वतःची वास्तू असलेल्या कोणत्याही देवरूखे संस्थेच्या कार्यालयात असू शकते. काल ताबडतोब त्यांनी ती छायाचित्रे विद्यार्थी सहायक संस्थेच्या कार्यालयात काल जमा केली. ती एकंदर 6 आहेत, त्यातील एकाचा फोटो जो माझ्याकडे आहे तो मी आपणास माहितीसाठी पाठवत आहे. अशीच काही देवरूखे विषयक पुस्तके श्री रमेश निंबकर, मुलुंड यांचे निवासस्थानी आहेत पण ती सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी कोणत्यातरी संस्थेने घ्यायला हवी. कुठूनतरी सुरवात व्हायला पाहिजे. !! फेसबुकवरील स्तंभलेखक, लंडनस्थित संकेत कुलकर्णी ( देवरूखे नव्हे) जेव्हा सावरकर, सुभाषचंद्र बोस, गांधीजी सारख्या विभूतींचे ब्रिटिश संग्रहालयातील जुने दस्तऐवज, फोटो पाठवतो त्यावेळी लोक त्याचे फेसबुकवर भरभरून कौतुक करतात पण ज्या ब्रिटिशांनी ते जपून ठेवले त्यांचा गुण आपण कधी घेणार? माधव भोळे
त्य

कै. तर्कतीर्थ रघुनाथ शास्त्री कोकजे, दर्शन अध्यापक, कैवल्य धाम, लोणावळा

कै. तर्कतीर्थ रघुनाथ शास्त्री कोकजे, दर्शन अध्यापक, कैवल्य धाम, लोणावळा. देवरूखे ब्राह्मण समाजातील, हिंदू धर्माचा गाढा अभ्यास असलेले कै रघुनाथ शास्त्री कोकजे यांची माहिती पुढील पिढीला व्हावी या साठी श्री मनोहर जोशी डोंबिवली यांनी केलेल्या विनंती वरून मी ही माहिती देत आहे. कै. रघुनाथ शास्त्री कोकजे लोणावळा हे संस्कृत, वेद आणि हिंदू धर्म ह्या विषयाचे गाढे अभ्यासक होते. लोणावळा येथील धर्मनिर्णय मंडळ या मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. वरील विषयावर त्यांनी धर्मस्वरूप निर्णय ( २७ नोव्हेंबर १९३३), नवं आचारधर्म, भारतीय तर्कशास्त्र प्रवेश ( ५ जून १९४३), उत्कर्षाचा राजमार्ग अशी विविध पुस्तके लिहिली आहेत. हिंदू धर्माचे आचरण सर्व सामान्य माणसाला सुटसुटीत व्हावे म्हणून मूळ तथ्य न बदलता प्रचलीत चालीरीती आणि मंत्रांमध्ये सुधारणा करून नवीन चालीरीती आणि धार्मिक प्रक्रियाना प्रोत्साहित करण्यासाठी पुणे येथे ज्ञान प्रबोधिनी संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. हिंदू धर्मातील सुधारणांबद्दलचे त्यांचे आधुनिक विचार ऐकून महात्मा गांधीनि त्यांना नवजीवन या त्यांच्या हिंदी मासिकात या विषयावर लेख लिहिण्यास विनंती केली होती आणि त्यांचे 2/3 लेख प्रसिद्ध झाले. माधव भोळे

Friday, March 18, 2022

श्री लक्ष्मी मल्लमर्दन वज्र्यलेप एक अनुभव:

आपल्या भारताला परंपरा आणि संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभला आहे. हिंदू धर्माची पाळेमुळे एवढी खोलवर रुजली आहेत की कितीही जरी आधुनिक विचारकर्ते असले तरी आपले मूळगाव, आपले कुलदैवत, आपले घरदार,आपले रीतिरिवाज मानणारी आणि आयुष्यात एकदा का होईना आपल्या गावच्या देवाच्या दर्शनाला जाण्याचा ही मंडळी प्रयत्न करतात. असाच एक देव, रत्नागिरी जिल्ह्यातील, चिपळूण तालुक्यातील वीर या गावी आहे. तिन्ही बाजूने डोंगर, डोंगरातून वाहणारा बारमाही धबधबा, सतत खळखळाट करत वहात असणारी नदी, अशा निसर्गरम्य देवपाट ह्या वीरच्या विभागात श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवतेचे भले मोठे मंदिर आहे आणि त्यामध्ये विराजमान झालेला ६ फूट उंच आणि 4.5 फूट रुंद असा हा देव सुमारे 350 वर्षापूर्वी वीर जवळील खाडीत एका नावाड्याला सापडला तो त्याने वीर मधील ब्राह्मण वर्गाला नेऊन दाखवला. बरेच दिवस खाडीत राहिल्यामुळे त्याची आधीच झीज झाली होती. तो खाडीतून बाहेर काढून त्याकाळी त्याची विधिवत पूजा अर्चा होऊन देवपाट येथे एक मंदिर बांधले गेले त्यात तो स्थानापन्न झाला. सध्याचे मंदिर 1940 साली बांधले असून ते अतिशय भव्य आणि डौलदार आहे. भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत म्हणतात "परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।4.8।।" अगदी तसाच भाव असलेला कुमारावस्थेतील श्रीकृष्ण आठ मल्लांना मारत आहे असे चित्र या मूर्तीत आहे. कृष्णाचा मामा, मथुरेचा राजा कंस, त्याचा भाऊ अक्रूड याला, दोन्ही भाचे श्रीकृष्ण आणि बलराम याना वृंदावनातून मथुरेमध्ये घेऊन यायची आज्ञा देतो. त्या प्रमाणे अक्रूड त्यांना घेऊन मथुरेत येतो. रस्त्यामध्ये एका शंकराच्या मंदिरात एक शिवधनुष्य असते ते श्रीकृष्ण विनासायास उचलतो आणि त्याठिकाणी श्रीकृष्णाची ताकद ओळखू येते. मथुरेमध्ये एका पटांगणात कंसाचे बलदंड मल्ल चाणुर आणि मुस्टिक हे एक प्रदर्शनिय कुस्ती सामने खेळत असतात. कंसाने ठरवल्याप्रमाणे ते कृष्णाला भडकवण्यासाठी आव्हान देतात जेणेकरून श्रीकृष्ण आणि बलराम कुस्ती खेळायला आले की त्या कुमाराना लोळवून त्यांची हत्या करायची असा कंसाचा डाव होता. पण प्रत्यक्षात या दोन्ही मल्लाना ते दोन्ही भाऊ ठार मारतात आणि पुढे कंस आपल्या आठ भावांना श्रीकृष्णावर चाल करायला सांगतो तर त्या आठही भावांचा आणि कंसाचा श्रीकृष्ण वध करतो. त्यानंतर मथुरेच्या गादीवर मूळ राजा उग्रसेन याला बसवून श्रीकृष्ण आणि बलराम तेथून निघतात अशी ती अख्यायिका आहे. या मूर्तीची गेल्या 350 वर्षात वातावरणामुळे आणि अभिषेक वगैरे मुळे आणखीन झीज होऊन त्याचे मूळ स्वरूप केव्हाच नष्ट होऊ लागले होते. अशा वेळी वज्र्यलेप करून मूर्ती परत मूळ अवस्थेत आणण्याचा प्रयत्न तज्ज्ञांच्या मार्फत करता येतो. पूर्वी वज्र्यलेप करताना नैसर्गिक साधन सामग्री वापरली जायची पण आता नवनवीन रसायने बाजारात उपलब्ध आहे ती आणि दगडाची बारीक पावडर वापरून हा केला जातो. कोणी सांगेल सुवर्ण भसम वापरतात, मोत्याची पावडर वापरतात ते सर्व खोटे आहे. आमच्या देवाची मूर्ती अतिशय मोठी आणि कलाकुसरीच्या दृष्टीने किचकट असल्यामुळे कारागीर निवडणे एक मोठे आव्हान होते. या बाबतीत पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये असलेल्या म्युझियम विभाग, तसेच आर्किलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी यातील तज्ञ उपलब्ध आहेत पण या विषयात या विभागांची ऑफिशियल सेवा उपलब्ध आहे असे कळले नाही. चांगला कारागीर शोधण्यासाठी आम्ही तीन चार कारागिरांची कामे प्रत्यक्ष जाऊन बघितली. आपल्या बजेटमधील चांगला कारागीर शोधणे एक मोठे आव्हान असते. आमचे बजेट फार कमी होते म्हणून आम्ही कोल्हापूर येथील श्री दिपकराव ओतारी याना हे काम दिले. (त्यांचा मोबाईल नंबर +91 97624 45200). ओतारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात बरीच आणि चांगली कामे केल्याचे संदर्भ आम्हाला मिळाले ती कामे आम्ही स्वतः जाऊन बघितली. त्यांनी आणि त्यांचा मुलगा योगेश ओतारी यांनी आमचे काम फक्त 2 महिन्यात वीर येथे राहून पूर्ण केले. अतिशय एकाग्रतेने कलात्मक काम करणारी, मितभाषी, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणारी व्यक्ती म्हणून मी त्यांची नक्की शिफारस करेन. त्यांच्या कामाची गुणवत्ता हे दोन फोटोच देतील. एक जुना फोटो आणि एक नवीन फोटो. माधव भोळे 9819479791

Monday, March 14, 2022

डॉ केतकर ज्ञानकोश काय प्रकरण आहे हे? देवरूखे ब्राह्मण ज्ञातीशी त्यांचा काय संघर्ष होता?

डॉ केतकर ज्ञानकोश काय प्रकरण आहे हे? देवरूखे ब्राह्मण ज्ञातीशी त्यांचा काय संघर्ष होता? पुणे येथील ईतिहास संशोधक मंडळाचे प्रमुख इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ( वि. का. राजवाडे) यानी मंडळाच्या एका सभेत एक लेख प्रसिद्ध केला त्यामध्ये देवरुखे ब्राह्मण यांचे बद्दल अपमान जनक माहिती दिली त्यापैकी एक म्हणजे "साताऱ्या जवळ देवराष्ट्र नावाचे एक राज्य होते त्या युद्धात तेथील राजा हरला", त्या हरलेल्या राजाची प्रजा जी कोकणात आली ते देवर्षी म्हणजे पुढे झालेले देवरूखे". असे म्हटले होते. प्रत्यक्षात विजयनगर साम्राज्य जे विजयनगर पासून ते पश्चिम अरबीसमुद्र असलेल्या कोकणापर्यंत पसरले होते तेथील काही भाग मूळ आदिवासी मंडळींचे होते, त्यांना शेती करणे माहीत नव्हते. त्या मंडळींना शेती शिकवून त्यांचेकडून महसूल तयार करून तो राजापर्यंत पोहीचवण्यासाठी जी मंडळी कर्नाटकातून कोकण विभागात आली ते देवरूखे. रुखे म्हणजे कानडी मध्ये रूप. देव रुखे म्हणजे देवाचे रूप. ही मंडळी जी कोकणातील जमिनीवर राजाचे प्रतिनिधी म्हणून काम करू लागली त्यातून खोतकी निर्माण झाली. खोत आणि इनामदार असे दोन मंडळी राज्याला महसूल भरू लागली आणि पडीक जमिनीमधून राजाचे उत्पन्न वाढले. सत्ता बदलानंतर हे खोत आदिलशाही चे काम करू लागले. आमच्या वीर गावातील आलेल्या मूळ पुरुषांची आडनावे देशप्रभु अशी होती असे म्हणतात. पुढे लोकांनी आपापल्या गावांप्रमाणे नावे बदलली. कोकणात सर्व ठिकाणी गावकीच्या देवळात पालखीच्या आधी रूपे लावतात त्यावेळी राजसत्ता आणि पूर्व सत्ता असे दोन तट असतात. पूर्व सत्ता म्हणजे मूल निवासी आणि राज सत्ता म्हणजे ही खोत मंडळी, राज्याचे प्रतिनिधी. पूर्वीच्या काळी राज सत्तेच्या हुकुमाशिवाय देवाला रूपे लावून पालखी देवळा बाहेर पडत नसे अशी प्रथा होती आणि अजूनही काही गावात आहे. दुसरा अपमान म्हणजे "देवरूखे ही मागासलेले ज्ञाती असून ते तापट स्वभावाचे आहेत असे त्यात लिहिले होते". हे प्रतिथयश देवरुख्याना मान्य नव्हते. त्याकाळी भिकाजी मोरेश्वर मादुसकर या शिक्षकाने पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाच्या त्याच सभेत राजवाडयानच्या या लिखाणावर आक्षेप घेतला. राजवाड्यांनि त्यांना पुरावे ध्या मग हे लिखाण बदलतो असे लिहून प्रकरण दाबून टाकले. राजवाड्यांच्या दरारा जास्त होता म्हणून कोणी काही बोलले नाही. पुढे हे प्रकरण भिकाजी मोरेश्वर मादुसकरानी त्या काळचे प्रतिथीयश व्यक्ती रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर जे कलकत्ता येथे इंग्रजी आणि संस्कृतचे प्राध्यापक आणि पुढे लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्य ग्रंथाचे प्रूफ रीडर आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी ( 1907 च्या सुरत काँग्रेस मध्ये झालेल्या जहाल विरुद्ध मवाळ गदारोळात टिळकांना सुरक्षित बाहेर काढले त्या ग्रुप पैकी एक) याना सांगितली. त्यांनी संशोधन करून "चितळे भट्ट प्रकरण" हे पुस्तक लिहिले त्यामध्ये रत्नागिरी जवळील बसनी गावच्या चितळे नावाच्या एका धनाढ्य ब्राह्मणाने भानू तेरेदेसाई नावाच्या शिक्षित ब्राहणाचा क्षुल्लक कारणासाठी अपमान करून, देवरूखे ब्राह्मणांना कसे बहिष्कृत केले. या बाबतीत त्यावेळच्या देवरूखे मंडळींनी चितळे यांचे विरुद्ध इतर धर्म पीठे आणि काशी चा मुक्ती मंडप येथे दाद मिळवून निर्णयाची पत्रे मिळवून देवरूखे कसे दोषमुक्त आहेत हे सिद्ध केले आणि आणि तसेच चितळे यांच्या पणतू ने लेखी माफी मागून हे प्रकरण मिटवले. या सर्वांची कागदपत्रे मिळवून या सर्वांची टिप्पणी या पुस्तकात दिली. पुढे डॉ केतकरांनी ज्ञान कोष लिहिताना इतिहास संशोधन मंडळाचा लेख आधार मानून तोच मजकूर जसाच्या तसा छापला. त्यावेळी सुद्धा देवरूखे मंडळी केतकरांकडे गेली. त्यांनी पुरावा मागीतला तसेच देवरूखे ब्राह्मण महासभा किंवा परिषदेचा मजकूर बदलावा आणि नवीन मजकूर काय असावा म्हणून ठराव मागितला. तो देण्यास खूप वेळ लागला मधल्या काळात देवरूख्यांच्या तीन परिषदा झाल्या पण ठरावाच्या मसुध्यावर एकमत होत नव्हते ( पूर्वी परिषदा ज्ञातीच्या प्रगतीच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी घेतल्या जायच्या). हा पत्रसंघर्ष सुरूच होता. पुढे मराठी विश्वकोशा मध्ये हा मजकूर सुधारला गेला. अशी आहे देवरूख्यांबद्दल ची ज्ञानकोषाची कहाणी. या बाबतीत "आम्ही कोण आपले कोण" हे दामूअण्णा तेरेदेसाई, गोवंडी, तसेच " देवरूखे ब्राह्मणांचा इतिहास" ( देवरूखे मित्र मंडळ प्रकाशक) यामध्ये सविस्तर माहिती आपणास मिळेल. त्यापैकी देवरूखे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाची एक कॉपी मी स्वतः मित्र मंडळाचे वतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका पॉली ओ हॅनलोन ज्या पूर्व आशिया इतिहास विभागाच्या प्रमुख होत्या त्या महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि त्यांच्या चाली रीती या वर संशोधन करीत होत्या त्यांना पाठवली. त्यांना वाजपेयी सरकारकडून ग्रांट प्राप्त झाली होती. पुण्यात आणि डेक्कन कॉलेज पुणे येथे काही काळ संशोधन केल्यामुळे त्यांना असखलीत मराठी येत होते. ऑक्सफर्ड विध्यापिठाच्या लायब्ररीत असलेले "देवरूखे ब्राह्मणाबद्दल शास्त्र संमत विचार - समज गैरसमज" हे विष्णू शास्त्री पंडित ( मदन मोहन मालवीय यांचे सहकारी) यांच्या पुस्तकाची कॉपी त्यांनी मला इमेल ने पाठवून दिली हे विशेष. माधव भोळे