Friday, March 18, 2022

श्री लक्ष्मी मल्लमर्दन वज्र्यलेप एक अनुभव:

आपल्या भारताला परंपरा आणि संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभला आहे. हिंदू धर्माची पाळेमुळे एवढी खोलवर रुजली आहेत की कितीही जरी आधुनिक विचारकर्ते असले तरी आपले मूळगाव, आपले कुलदैवत, आपले घरदार,आपले रीतिरिवाज मानणारी आणि आयुष्यात एकदा का होईना आपल्या गावच्या देवाच्या दर्शनाला जाण्याचा ही मंडळी प्रयत्न करतात. असाच एक देव, रत्नागिरी जिल्ह्यातील, चिपळूण तालुक्यातील वीर या गावी आहे. तिन्ही बाजूने डोंगर, डोंगरातून वाहणारा बारमाही धबधबा, सतत खळखळाट करत वहात असणारी नदी, अशा निसर्गरम्य देवपाट ह्या वीरच्या विभागात श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवतेचे भले मोठे मंदिर आहे आणि त्यामध्ये विराजमान झालेला ६ फूट उंच आणि 4.5 फूट रुंद असा हा देव सुमारे 350 वर्षापूर्वी वीर जवळील खाडीत एका नावाड्याला सापडला तो त्याने वीर मधील ब्राह्मण वर्गाला नेऊन दाखवला. बरेच दिवस खाडीत राहिल्यामुळे त्याची आधीच झीज झाली होती. तो खाडीतून बाहेर काढून त्याकाळी त्याची विधिवत पूजा अर्चा होऊन देवपाट येथे एक मंदिर बांधले गेले त्यात तो स्थानापन्न झाला. सध्याचे मंदिर 1940 साली बांधले असून ते अतिशय भव्य आणि डौलदार आहे. भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत म्हणतात "परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।4.8।।" अगदी तसाच भाव असलेला कुमारावस्थेतील श्रीकृष्ण आठ मल्लांना मारत आहे असे चित्र या मूर्तीत आहे. कृष्णाचा मामा, मथुरेचा राजा कंस, त्याचा भाऊ अक्रूड याला, दोन्ही भाचे श्रीकृष्ण आणि बलराम याना वृंदावनातून मथुरेमध्ये घेऊन यायची आज्ञा देतो. त्या प्रमाणे अक्रूड त्यांना घेऊन मथुरेत येतो. रस्त्यामध्ये एका शंकराच्या मंदिरात एक शिवधनुष्य असते ते श्रीकृष्ण विनासायास उचलतो आणि त्याठिकाणी श्रीकृष्णाची ताकद ओळखू येते. मथुरेमध्ये एका पटांगणात कंसाचे बलदंड मल्ल चाणुर आणि मुस्टिक हे एक प्रदर्शनिय कुस्ती सामने खेळत असतात. कंसाने ठरवल्याप्रमाणे ते कृष्णाला भडकवण्यासाठी आव्हान देतात जेणेकरून श्रीकृष्ण आणि बलराम कुस्ती खेळायला आले की त्या कुमाराना लोळवून त्यांची हत्या करायची असा कंसाचा डाव होता. पण प्रत्यक्षात या दोन्ही मल्लाना ते दोन्ही भाऊ ठार मारतात आणि पुढे कंस आपल्या आठ भावांना श्रीकृष्णावर चाल करायला सांगतो तर त्या आठही भावांचा आणि कंसाचा श्रीकृष्ण वध करतो. त्यानंतर मथुरेच्या गादीवर मूळ राजा उग्रसेन याला बसवून श्रीकृष्ण आणि बलराम तेथून निघतात अशी ती अख्यायिका आहे. या मूर्तीची गेल्या 350 वर्षात वातावरणामुळे आणि अभिषेक वगैरे मुळे आणखीन झीज होऊन त्याचे मूळ स्वरूप केव्हाच नष्ट होऊ लागले होते. अशा वेळी वज्र्यलेप करून मूर्ती परत मूळ अवस्थेत आणण्याचा प्रयत्न तज्ज्ञांच्या मार्फत करता येतो. पूर्वी वज्र्यलेप करताना नैसर्गिक साधन सामग्री वापरली जायची पण आता नवनवीन रसायने बाजारात उपलब्ध आहे ती आणि दगडाची बारीक पावडर वापरून हा केला जातो. कोणी सांगेल सुवर्ण भसम वापरतात, मोत्याची पावडर वापरतात ते सर्व खोटे आहे. आमच्या देवाची मूर्ती अतिशय मोठी आणि कलाकुसरीच्या दृष्टीने किचकट असल्यामुळे कारागीर निवडणे एक मोठे आव्हान होते. या बाबतीत पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये असलेल्या म्युझियम विभाग, तसेच आर्किलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी यातील तज्ञ उपलब्ध आहेत पण या विषयात या विभागांची ऑफिशियल सेवा उपलब्ध आहे असे कळले नाही. चांगला कारागीर शोधण्यासाठी आम्ही तीन चार कारागिरांची कामे प्रत्यक्ष जाऊन बघितली. आपल्या बजेटमधील चांगला कारागीर शोधणे एक मोठे आव्हान असते. आमचे बजेट फार कमी होते म्हणून आम्ही कोल्हापूर येथील श्री दिपकराव ओतारी याना हे काम दिले. (त्यांचा मोबाईल नंबर +91 97624 45200). ओतारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात बरीच आणि चांगली कामे केल्याचे संदर्भ आम्हाला मिळाले ती कामे आम्ही स्वतः जाऊन बघितली. त्यांनी आणि त्यांचा मुलगा योगेश ओतारी यांनी आमचे काम फक्त 2 महिन्यात वीर येथे राहून पूर्ण केले. अतिशय एकाग्रतेने कलात्मक काम करणारी, मितभाषी, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणारी व्यक्ती म्हणून मी त्यांची नक्की शिफारस करेन. त्यांच्या कामाची गुणवत्ता हे दोन फोटोच देतील. एक जुना फोटो आणि एक नवीन फोटो. माधव भोळे 9819479791

Monday, March 14, 2022

डॉ केतकर ज्ञानकोश काय प्रकरण आहे हे? देवरूखे ब्राह्मण ज्ञातीशी त्यांचा काय संघर्ष होता?

डॉ केतकर ज्ञानकोश काय प्रकरण आहे हे? देवरूखे ब्राह्मण ज्ञातीशी त्यांचा काय संघर्ष होता? पुणे येथील ईतिहास संशोधक मंडळाचे प्रमुख इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ( वि. का. राजवाडे) यानी मंडळाच्या एका सभेत एक लेख प्रसिद्ध केला त्यामध्ये देवरुखे ब्राह्मण यांचे बद्दल अपमान जनक माहिती दिली त्यापैकी एक म्हणजे "साताऱ्या जवळ देवराष्ट्र नावाचे एक राज्य होते त्या युद्धात तेथील राजा हरला", त्या हरलेल्या राजाची प्रजा जी कोकणात आली ते देवर्षी म्हणजे पुढे झालेले देवरूखे". असे म्हटले होते. प्रत्यक्षात विजयनगर साम्राज्य जे विजयनगर पासून ते पश्चिम अरबीसमुद्र असलेल्या कोकणापर्यंत पसरले होते तेथील काही भाग मूळ आदिवासी मंडळींचे होते, त्यांना शेती करणे माहीत नव्हते. त्या मंडळींना शेती शिकवून त्यांचेकडून महसूल तयार करून तो राजापर्यंत पोहीचवण्यासाठी जी मंडळी कर्नाटकातून कोकण विभागात आली ते देवरूखे. रुखे म्हणजे कानडी मध्ये रूप. देव रुखे म्हणजे देवाचे रूप. ही मंडळी जी कोकणातील जमिनीवर राजाचे प्रतिनिधी म्हणून काम करू लागली त्यातून खोतकी निर्माण झाली. खोत आणि इनामदार असे दोन मंडळी राज्याला महसूल भरू लागली आणि पडीक जमिनीमधून राजाचे उत्पन्न वाढले. सत्ता बदलानंतर हे खोत आदिलशाही चे काम करू लागले. आमच्या वीर गावातील आलेल्या मूळ पुरुषांची आडनावे देशप्रभु अशी होती असे म्हणतात. पुढे लोकांनी आपापल्या गावांप्रमाणे नावे बदलली. कोकणात सर्व ठिकाणी गावकीच्या देवळात पालखीच्या आधी रूपे लावतात त्यावेळी राजसत्ता आणि पूर्व सत्ता असे दोन तट असतात. पूर्व सत्ता म्हणजे मूल निवासी आणि राज सत्ता म्हणजे ही खोत मंडळी, राज्याचे प्रतिनिधी. पूर्वीच्या काळी राज सत्तेच्या हुकुमाशिवाय देवाला रूपे लावून पालखी देवळा बाहेर पडत नसे अशी प्रथा होती आणि अजूनही काही गावात आहे. दुसरा अपमान म्हणजे "देवरूखे ही मागासलेले ज्ञाती असून ते तापट स्वभावाचे आहेत असे त्यात लिहिले होते". हे प्रतिथयश देवरुख्याना मान्य नव्हते. त्याकाळी भिकाजी मोरेश्वर मादुसकर या शिक्षकाने पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाच्या त्याच सभेत राजवाडयानच्या या लिखाणावर आक्षेप घेतला. राजवाड्यांनि त्यांना पुरावे ध्या मग हे लिखाण बदलतो असे लिहून प्रकरण दाबून टाकले. राजवाड्यांच्या दरारा जास्त होता म्हणून कोणी काही बोलले नाही. पुढे हे प्रकरण भिकाजी मोरेश्वर मादुसकरानी त्या काळचे प्रतिथीयश व्यक्ती रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर जे कलकत्ता येथे इंग्रजी आणि संस्कृतचे प्राध्यापक आणि पुढे लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्य ग्रंथाचे प्रूफ रीडर आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी ( 1907 च्या सुरत काँग्रेस मध्ये झालेल्या जहाल विरुद्ध मवाळ गदारोळात टिळकांना सुरक्षित बाहेर काढले त्या ग्रुप पैकी एक) याना सांगितली. त्यांनी संशोधन करून "चितळे भट्ट प्रकरण" हे पुस्तक लिहिले त्यामध्ये रत्नागिरी जवळील बसनी गावच्या चितळे नावाच्या एका धनाढ्य ब्राह्मणाने भानू तेरेदेसाई नावाच्या शिक्षित ब्राहणाचा क्षुल्लक कारणासाठी अपमान करून, देवरूखे ब्राह्मणांना कसे बहिष्कृत केले. या बाबतीत त्यावेळच्या देवरूखे मंडळींनी चितळे यांचे विरुद्ध इतर धर्म पीठे आणि काशी चा मुक्ती मंडप येथे दाद मिळवून निर्णयाची पत्रे मिळवून देवरूखे कसे दोषमुक्त आहेत हे सिद्ध केले आणि आणि तसेच चितळे यांच्या पणतू ने लेखी माफी मागून हे प्रकरण मिटवले. या सर्वांची कागदपत्रे मिळवून या सर्वांची टिप्पणी या पुस्तकात दिली. पुढे डॉ केतकरांनी ज्ञान कोष लिहिताना इतिहास संशोधन मंडळाचा लेख आधार मानून तोच मजकूर जसाच्या तसा छापला. त्यावेळी सुद्धा देवरूखे मंडळी केतकरांकडे गेली. त्यांनी पुरावा मागीतला तसेच देवरूखे ब्राह्मण महासभा किंवा परिषदेचा मजकूर बदलावा आणि नवीन मजकूर काय असावा म्हणून ठराव मागितला. तो देण्यास खूप वेळ लागला मधल्या काळात देवरूख्यांच्या तीन परिषदा झाल्या पण ठरावाच्या मसुध्यावर एकमत होत नव्हते ( पूर्वी परिषदा ज्ञातीच्या प्रगतीच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी घेतल्या जायच्या). हा पत्रसंघर्ष सुरूच होता. पुढे मराठी विश्वकोशा मध्ये हा मजकूर सुधारला गेला. अशी आहे देवरूख्यांबद्दल ची ज्ञानकोषाची कहाणी. या बाबतीत "आम्ही कोण आपले कोण" हे दामूअण्णा तेरेदेसाई, गोवंडी, तसेच " देवरूखे ब्राह्मणांचा इतिहास" ( देवरूखे मित्र मंडळ प्रकाशक) यामध्ये सविस्तर माहिती आपणास मिळेल. त्यापैकी देवरूखे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाची एक कॉपी मी स्वतः मित्र मंडळाचे वतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका पॉली ओ हॅनलोन ज्या पूर्व आशिया इतिहास विभागाच्या प्रमुख होत्या त्या महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि त्यांच्या चाली रीती या वर संशोधन करीत होत्या त्यांना पाठवली. त्यांना वाजपेयी सरकारकडून ग्रांट प्राप्त झाली होती. पुण्यात आणि डेक्कन कॉलेज पुणे येथे काही काळ संशोधन केल्यामुळे त्यांना असखलीत मराठी येत होते. ऑक्सफर्ड विध्यापिठाच्या लायब्ररीत असलेले "देवरूखे ब्राह्मणाबद्दल शास्त्र संमत विचार - समज गैरसमज" हे विष्णू शास्त्री पंडित ( मदन मोहन मालवीय यांचे सहकारी) यांच्या पुस्तकाची कॉपी त्यांनी मला इमेल ने पाठवून दिली हे विशेष. माधव भोळे