Thursday, February 17, 2022

देवरूखे ब्राह्मण 1

काल एक मित्र भेटला होता. म्हणाला त्याच्या मुलीचे लग्न करायचे आहे. मुलगी शिकलेली आहे, ति नोकरी सुद्धा करते, दिसायला सुंदर आहे. एक देवरूखे ब्राह्मण मुलगा सांगून आला आहे. चांगला शिकलेला आणि होतकरु आहे. नोकरी सुद्धा उत्तम आहे. मी म्हटले मग अडचण काय आहे? म्हणाला देवरूखे ब्राह्मण ही ज्ञाती मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. मी विचारले तुमची ज्ञाती कोणती? तो म्हणाला आम्ही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मी विचारले तुम्ही शाकाहारी का? तो म्हणाला हो आम्ही शाकाहारी. तुमचे मुळगाव गाव कोणते ? तो म्हणाला आम्ही लातूर चे. मी म्हटले बरे, आता नीट समजावून घे. मराठी ब्राह्मण हे पंच द्रविड ब्राह्मण मध्ये येतात. जे ब्राह्मण गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू मध्ये रहातात त्यांना पंच द्रविड ब्राह्मण असे म्हणतात यातील बहुतेकांचे संस्कार आणि चालीरीती सारख्या असल्यामुळे ते एका समूहात ( ग्रुप) मध्ये धरले जातात. भारतातील उरलेल्या सर्व ब्राह्मणांना पंच गौड ब्राह्मण असे म्हणतात. या पैकी महाराष्ट्रात पाच मुख्य प्रकारचे मराठी शाकाहारी ब्राह्मण आहेत. कोकणस्थ किंवा त्यातील काही स्वतःला चित्तापावन म्हणवतात, देशस्थ यांच्यामध्ये परत दोन उपशाखा आहेत देशस्थ ऋग्वेदी, देशस्थ यजुर्वेदी, कऱ्हाडे, देवरूखे. या पैकी देवरूखे हे बहुल्यकरून करून संपूर्ण रत्नागिरी जिल्हा, कर्जत (रायगड), उंबरगाव पंचक्रोशी जी गुजरात बोर्डरजवळ आहे, मध्यप्रदेश मधील पूर्वीची संस्थाने, बडोदा गुजरात या ठिकाणी आढळतात. यांची प्रमुख आडनावे म्हणजे वीरकर, निमकर, निंबकर, कारूळकर, पिंपुटकर, जुवेकर, कार्येकर, कराडकर, मुळे, भोळे, काळे, कोकजे, ढापरे, ढालकर इत्यादी. देवरूखे मूलतः सर्व शाकाहारी मंडळी असून पूर्वी ह्यांचे व्यवसाय म्हणजे भिक्षुकी, शेती, कारभारी ( मॅनेजर), हिशोब तपासनीस, हॉटेल व्यवसाय, सरकारी नोकऱ्या. आजकाल इतर सर्व समाजांप्रमाणे यांची मुले सुद्धा विविध विषयात प्राविण्य मिळवत असून आपापले बुद्धिमत्व सिद्ध करत आहेत. सचोटी, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा, मेहेनत करणे आणि औदार्य हे त्यांच्यापैकी अनेकांचे स्थायीभाव आहेत. अगदी ओळखच ध्यायची झाली तर महाराष्ट्रातील पहिली इंग्रजी मराठी डिक्शनरी ज्या विद्वानांनी लिहिली ते के. बी. ( कृष्णाजी भास्कर) वीरकर, डिक्शनरी वाले हे सुद्धा देवरूखेच आणि वीर या चिपळूण जवळील गावातले. अनेक उच्चविद्याविभूषित आणि थोर मंडळी या समाजात सुद्धा होऊन गेली आणि आहेत. तू योग्य चौकशी करून बीनधास्त या स्थळाबद्दल विचार करायला हरकत नाही. खरे म्हणजे आजकाल एव्हडे शाखाभेद कोणी मानत नाहीत कारण सर्व ब्राह्मण विशेषतः मराठी ब्राह्मण एक होणे आवश्यक आहे तरी पण तू विचारलेस म्हणून ही माहिती सांगितली. मित्राने म्हटले, आता मला बऱ्यापैकी उलगडा झाला, नाहींतर माझ्या अज्ञानामुळे मी एका चांगल्या व्यक्तीला मुकलो असतो. असो, माधव भोळे

No comments:

Post a Comment