आणखी एक आठवण
काल एक न्यूज रिपोर्ट बघितला. जागतिक आर्थिक उलढालींवर लक्ष ठेवणारी फोर्ब्स ह्या जागतिक कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात "सारस्वत बँक" ही एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्र सारख्या दिगज्जना मागे टाकीत भारतातील दुसरी उत्तम बँक आहे असे म्हटले आहे. या मुळे भारतीय सहकार चळवळीला, भारतीय अर्थव्यवस्थेत, तिने एक अग्रेसर स्थान मिळवून दिले आहे.
सारस्वत बँक 1918 साली स्थापन झाली तर सन्मित्र सहकारी बँक 1924 ला स्थापन झाली. दोन्हींची स्थापना गिरगावातून, फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरून. सन्मित्र बँक मुगभाट मध्ये तर सारस्वत बँक निकदवरी लेन मध्ये.
माझे वडिलांनी वकिलाकडे नोकरी करून शिवाय सन्मित्र बँकेच्या अडचणीच्या काळात 14 वर्ष मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केले होते. त्या वेळी सन्मित्र बँकेत फार चांगली, निस्पृह, समाजाला पुढे आणावे अशी श्रद्धा असलेली मंडळी काम करीत होती. हळुहळु नवीन मंडळी त्यात येऊ लागली. जुने आणि नवे यांच्यात थोडाफार विचारात किंवा बँक कशी चालवायची या बाबतीत फरक होऊ लागला आणि हळूहळू जुनी मंडळी वायोपरत्वे बाहेर पडली.
माझे वडिलांचे त्यावेळच्या सारस्वत बँकेच्या उच्चपदस्थ तसेच डायरेक्टर मंडळींशी वैयक्तिक सम्बन्ध होते. या मंडळींचे शिक्षण आणि त्यांचे व्यवसाय खरोखरच मोठे आणि नावाजलेले (outstanding) होते. त्यातील काही ठळक नावे म्हणजे कै. विजयालक्ष्मी पंडित यांचे दिर कै. वसंतराव पंडित, चंद्रकांत वर्दे शेयरब्रोकर, डॉ. पी. डब्ल्यू. रेगे हे कायद्यांत पीएचडी आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल वगैरे. चांगले काम करून त्यांनी त्यांच्या समाजाचा आणि इतर समाजाचा विश्वास संपादन केला आणि बँकेचा व्यवसाय वाढवला. माझे वडील मला नेहमी सांगायचे, "ही सारस्वत बँक आता लहान आहे (त्यावेळी फक्त ७ किव्वा ८ शाखा) पण बघ ही एक दिवस फार पुढे जाईल. कारण जरी या मंडळींमध्ये मतभेद असले तरी समाज म्हणून हे एकसंघ आहेत". आज त्यांचे वाक्य खरे ठरत आहे. पुढे पूर्वाश्रमीचे शिवसेना आणि आता भाजप चे खासदार श्री. सुरेश प्रभू, सी ए, यांनी अतिशय तरुण वयात त्या बँकेचे अध्यक्ष म्हणून काम बघितले तसेच कै एकनाथ ठाकूर हे शिवसेना खासदार सुद्धा या बँकेचे अध्यक्ष होते. या सर्व मंडळीने आणि निष्ठावान कर्मचारी वर्गाने ही बँक नावारूपाला आणली त्याचे हे फलित आहे.
माझी पहिली नोकरी सारस्वत बँक, निकदवारी लेन मधीलच. त्यामुळे मी त्या मंडळींना जवळून ओळखतो.
याउलट सन्मित्र मधील नवीन मंडळी सुशिक्षित होती. परंतु त्यातील काही जण वेगवेगळे उद्देश घेऊन बँकेत काम करण्यासाठी आली होती. मग प्रत्येकाने आपला एक मतदारसंघ बनवून एकगठ्ठा मतदान आणण्यास सुरुवात झाली. त्या मतदारांना खुश ठेवण्यासाठी त्याना अवाजवी कर्ज किंवा बेकायदेशीर कर्ज ध्यायला सुरवात झाली. त्यात काहींनी स्वतःचे हात सुद्धा धुवून घेतले. हळूहळू ही प्रकरणे वाढत चालली. दरम्यान माझे वडील निधन पावले होते (१९७९). मी २५ वर्षाचा होतो, आणि समाजासाठी काहीतरी करावे अशी भावना मनात होती. १९८१ साली बँकेत होत असलेल्या गैर व्यवहाराची सम्पूर्ण माहिती माझ्यापद्धतीने घेऊन हा विषय माझे जेष्ठ नातेवाईक थोर समाजसेवक कै. नारायण सखाराम वीरकर, डोंबिवली यांच्याशी बोललो. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मित्र बँकेच्या त्यावेळच्या संचालकांविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला आणि त्यामध्ये तो ठराव बहुमताने त्यांच्या विरुद्ध गेला आणि ते पाय उतार झाले. परंतु त्यानंतर नवीन आलेले संचालक सुद्धा त्याच पद्धतीने काम करू लागले आणि हळूहळू त्या बँकेची अधोगती होत गेली. याचे मुख्य कारण म्हणजे बँकेने कर्ज घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करणारे सभासद बनवले कारण अशा मतदारांकडून निवडून येण्यात त्यांना फायदा होता. ( काही ठिकाणी दोन कॅटेगरीचे सभासद असतात एक कर्ज घेणारे पण ते मतदानात भाग घेऊ शकत नाहीत, दोन जे मतदानात भाग घेऊ शकतात). त्यावेळच्या संचालकांनी गैरकृत्य केल्यामुळे सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित समाजाने सन्मित्र बँकेकडे पाठ फिरवली. शेवटी ती बँक दुसऱ्या बँकेत एकत्र होऊन सुरवातीला देवरुखे मंडळींनी, सहकार्याने उद्धार करण्यासाठी स्थापन केलेल्या सन्मित्र बँकेतील आपले अस्तित्व पूर्ण नष्ट केले. हीच गोष्ट इतर काही समाज्याच्या बँकांचे बाबतीत झाली.
जर त्यावेळी समाजाने, वाट चुकलेल्या सन्मित्र बँकेवर अंकुश ठेवून तिच्यात प्रगती घडवून आणली असती तर तिचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी झाला असता आणि आज हे चित्र पालटले असते आणि देवरूखे समाजाकडे एक अर्थसम्पन्न बँक राहिली असती.
असो, नवीन पिढीला हा इतिहास माहिती व्हावा आणि इतिहास आपल्याला मार्गदर्शक असतो अशी भावना ठेवून ही कटू आठवण मी सर्वांसमोर मांडली आहे. या समाजात अजूनही त्या घटनेतील काही साक्षीदार अस्तित्वात आहेत. ते ही गोष्ट नक्कीच मान्य करतील.
माधव भोळे
No comments:
Post a Comment