Saturday, July 31, 2021

देवरुखे समाजाच्या जडणघडणीमध्ये देवरुखे ज्ञाती संस्थांचा अमूल्य वाटा

देवरुखे समाजाच्या जडणघडणीमध्ये देवरुखे ज्ञाती संस्थांचा किती अमूल्य वाटा आहे याचे एक उत्तम उदाहरण म्हणून देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधीला आलेले एक पत्र देणगीदाराच्या परवानगीने आवर्जून प्रसिद्ध करत आहे.

३१.०५.२०२१

प्रति;  अध्यक्ष

देवरुखे ब्राम्हण अनाथ कौटुंबिक निधी, मुंबई

स.न. वि. वि.

मी पाच वर्षाचा असताना माझे वडील १९४७ साली निर्वतले. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीनुसार, आईवर डोंगरच कोसळला. कोणतेही आर्थिक साधन नाही त्यात आईच्या पदरी आम्ही दोन मुले होतो. अशा परिस्थितीत आई आम्हाला घेऊन आमच्या आजोळी म्हणजे खत्तलवाड येथे श्री डांगे यांचेकडे आली.

कोणताही आर्थिक आधार नाही, स्वतःची शैक्षणिक पात्रता नाही. होता फक्त  आजोळचा भक्कम मानसिक आधार!. आईने अपार कष्ट करून, आम्हाला शिकवून येथपर्यंत आणून सोडले. त्या वेळी कै. मोरूभाऊ ढापरे यांनी आईची दयनीय अवस्था बघून संस्थेकडे अर्ज करण्यास सांगितले.

मला साल आठवत नाही पण साधारण १९५४ - ५६ चे दरम्यान आईला वार्षिक रुपये २०/- अशी लागोपाठ २ वर्ष मदत मिळाली. त्या चाळीस रुपये मदतीचे मोल अनन्य आहे. मी आता ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि त्यानिमित्त संस्थेला रु ५०,००० ची देणगी देत आहे तिचा स्वीकार व्हावा.

आपला नम्र,

श्री सुहास विठ्ठल मुळे, कीर्ती सोसायटी ठाणे (पूर्व), 400 603.

 

 

श्री चंद्रकांत जोशी ( C. N. Joshi), रत्नागिरी, यांचे २० मे २०२०

 दुःखद निधन


रत्नागिरी येथील प्रतिथयश कारखानदार श्री चंद्रकांत जोशी ( C. N. Joshi), रत्नागिरी, यांचे २० मे २०२० रोजी सकाळी वृद्धापकाळाने देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ होते. घरची परिस्थिती मध्यम असताना आणि तांत्रिक शिक्षण नसताना सुद्धा त्यांनी डोंबिवली येथे, भागीदारीत मशीन पार्टस चा छोटा कारखाना काढला. पुढे वयाच्या ३६ व्या वर्षी नशीब अजमावण्यासाठी त्यांनी रत्नागिरी येथे एम. आय. डी. सि. ची जागा घेऊन, श्री एंटरप्राइज या नावाने नवीन कारखाना उभारला.

तो स्थिरस्थावर होईपर्यंत काही वर्षे कारखान्याच्या शेडच्या एका खोलीत संसार आणि दुसऱ्या खोलीत मशिनरी असा थाट होता. पुढे कारखाना जोमात चालायला लागला आणि अडचणी दूर होत गेल्या तसा त्यांनी कारखान्या समोरच नवीन बंगला बांधला. रत्नागिरी सारख्या दूरठिकाणी असून सुद्धा खात्रीशीर आणि किफायतशीर मूल्यात माल, वेळेत काम, आणि मेहनती कामगार वर्ग यांच्या जोरावर त्यांनी महेंद्र आणि महेंद्र, बजाज ऑटो सारख्या दिगग्ज कंपन्यांशी आपला सबंध जोडला. वयाच्या साठी नंतर त्यांनी हळूहळू कारखान्याची सूत्र मुलगा अतुल याच्या ताब्यात दिली. अतुलने हा कारखाना आपल्या कौशल्य आणि मेहनतीवर आणखी बहरास आणला आहे. 

त्यांचे पश्चात त्यांची पत्नी वैशाली, मुलगा अतुल, स्नुषा आदिती, मुलगी अपर्णा व जावई आणि नातवंड आहेत.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.

माधव भोळे

श्री राम गणेश तथा रामभाऊ निमकर ( दुःखद निधन).

 श्री राम गणेश तथा रामभाऊ निमकर ( दुःखद निधन).

श्री राम गणेश तथा रामभाऊ निमकर यांना देवरुखे समाजात ओळखत नाही असा माणूस विरळाच.  एकेकाळी देवरुखे ब्राह्मण विध्यार्थी साहाय्यक संस्था म्हणजे रामभाऊ असे समीकरणच होते.

१९६९ सालच्या विध्यार्थी साहाय्यक संस्थेच्या हीरक महोत्सवात “रमेश मित्र मंडळ” आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर रामभाऊंनी देवऋख्यांच्या सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. रामभाऊ हिंदी मध्ये एम. ए. आणि हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीची रत्न हि पदवी प्राप्त होते, तसेच ते विला तेरेसा, पेडर रोड, मुंबई या कॉन्व्हेंट शाळेत हिंदी, मराठी आणि इतर विषय शिकवत. मराठीवर प्रभुत्व आणि समाजकार्याची आवड असल्यामुळे सहाजिकच त्यावेळच्या संस्थेच्या उच्चपदस्थानी त्यांना हेरले आणि पुढे विध्यार्थी साहाय्यक संस्थेचे चिटणीस म्हणून बाळासाहेब तथा गो. भा. कुळकर्णी यांचेबरोबर ते सहचिटणीस म्हणून काम करू लागले. १९७६ साली झालेल्या शैक्षणिक संस्थांच्या विलीनीकरणामध्ये रामभाऊंचा मोलाचा वाटा आहे. 

माझा आणि त्यांचा सामाजिक परिचय  १९७९-८० दरम्यान संस्थेच्या विध्यार्थी पुस्तक पेढी मुळे आला.  सुरवातीपासूनच विध्यार्थी पुस्तक पेढीला रामभाऊंनी भरपूर सहकार्य केले.  १९८४ साली कै लक्ष्मणराव भोळे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या अमृत महोत्सवात रामभाऊंनी  बाळासाहेबांच्या आणि लक्ष्मणरावांच्या खांद्याला खांदा लावून अतिशय जोमाने काम केले.  २५.०६.२००५ पासून रामभाऊंनी विध्यार्थी साहाय्यक संस्थेच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. 

३६ वर्ष सलग काम करून सुद्धा त्यांनी कोणत्याही पदाचा कधीही हट्ट केला नाही आणि जी जबाबदारी वाट्याला येईल ती मिटल्या ओठाने, हसऱ्या चेहऱ्याने, सक्षमपणे सांभाळली. ते नेहमी म्हणत कि असे काम केले नाही तर संस्थेची घडी टिकून रहाणार नाही. त्यांनी सन्मित्र सहकारी बँकेमध्ये सुद्धा एक वर्ष निर्देशक म्हणून काम केले आहे. शिवाय डोंबिवली येथे २००० साली झालेल्या जागतिक परिषदेमध्ये त्यांनी यथोचित काम केले आहे.

२००७ नन्तर त्यांनी हळूहळू विद्यार्थी सहायक संस्थेमधून निवृत्ती घेतली. परंतु त्यांचे सामाजिक काम केलेले मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांचे मित्रवर्य बाळासाहेब यांच्या निधनानंतर, बाळासाहेब सांभाळत असलेल्या "देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी", "देवरुखे ब्राम्हण शिक्षण फ़ंड" या संस्थांची धुरा त्यांनी अंगावर घेतली. २३ जानेवारी २०११ रोजी झालेल्या “देवरुखे ब्राम्हण अनाथ कौटुंबिक निधी” च्या हीरक महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामगिरीतून संस्थेला खर्च वजा जाता रुपये १५ लाख एवढी भरघोस रक्कम त्यांनी मिळवून दिली तसेच तो कार्यक्रम "देवरुखे युवा" यांच्या बरोबर करून सहकाराचा एक नवा पायंडा समाजात पाडला.

हे सर्व करीत असताना आपला मूळगाव कुडली येथे सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली. १९७२ साली कुडली येथील श्री लक्ष्मी नारायण देवस्थानाच्या न्यासाचा झालेल्या शतक महोत्सवात महत्वाची भूमिका बजावून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यानी मूळ निधीत मोलाची भर घातली तसेच तरुण पिढीला आकर्षित करून होणार वार्षिक कार्तिक महोत्सव बहरास आणला. त्यामुळे त्यांना सुद्धा  देवकार्यात गोडी  निर्माण झाली. 

१९७८ साली कुडली येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने "कुडली विकास मंडळ"  स्थापन करून त्याद्वारे कुडलीचा रस्ते, वीज, पाणी या दैनंदिन विकासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयास केला आणि त्याबाबतीत बरेच यश मिळवले. कुडली बद्दल त्यांना मनपूर्वक आस्था होती

ऐन तारुण्यात आलेल्या शारीरिक अडचणीवर मात करून प्रपंच्याच्या रहाटगाडग्यात सकाळी ७ ते रात्री ९ वाजे पर्यंत विद्यादानाचे काम करित, रात्री १० ते ११.३०  दररोज बाळासाहेबांबरोबर विद्यार्थी साहाय्यक संस्थेत काम करून आपली समाजाप्रती असलेली सद्भावना आणि सामाजिक ऋण फेडत रामभाऊंनि आपली कारकीर्द उज्वल केली. आधीच नावारूपास असलेली विध्यार्थी सहायक संस्था या जोडगोळीने आणखी एका उंच स्तरावर नेऊन ठेवली. त्या दोघांचा लोकसंग्रह अतिशय दांडगा होता.

त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी "कै. अंजली निमकर" यांची सुयोग्य साथ लाभली. त्यांच्या निगर्वी आणि समंजस स्वभावामुळे त्यांनी समाजात अनेक माणसे जोडली. ते नेहमी मला सांगत “माधव सामाजिक कार्य म्हटले म्हणजे तोंडात साखर, डोक्यावर बर्फाची लादी ठेवली तरच चांगले काम हातून घडेल”.  वयाची ८५ ओलांडल्यानंतर ते शारीरिक अडचणींमुळे काम करू शकत नाही याची त्यांना खन्त वाटे, परंतु कोणी माणूस भेटायला गेला कि ते या सर्व संस्थांची आपुलकीने विचारपूस करत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत.

दिनांक १४ मे २०२० सकाळी ७ वाजता वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत वृद्धापकाळामुळे मावळली. त्यांचे पश्चात त्यांचा सुपुत्र संतोष, स्नुषा कविता आणि 3 विवाहित मुली तसेच नातवंड असा मोठा परिवार आहे.

देव त्यांच्या आत्म्यास सदगती देवो. त्यांनी केलेले सामाजीक कार्य या पेक्षा जोमाने सुरू रहावे हीच त्याना खरी श्रद्धांजली होईल.

माधव भोळे.
मोबाईल 98194 79791

आणखी एक आठवण "सारस्वत बँक"

 आणखी एक आठवण


काल एक न्यूज रिपोर्ट बघितला. जागतिक आर्थिक उलढालींवर लक्ष ठेवणारी फोर्ब्स ह्या जागतिक कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात "सारस्वत बँक" ही एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्र सारख्या दिगज्जना मागे टाकीत भारतातील दुसरी उत्तम बँक आहे असे म्हटले आहे. या मुळे भारतीय सहकार चळवळीला, भारतीय अर्थव्यवस्थेत, तिने एक अग्रेसर स्थान मिळवून दिले आहे.

सारस्वत बँक 1918 साली स्थापन झाली तर सन्मित्र सहकारी बँक 1924 ला स्थापन झाली. दोन्हींची स्थापना गिरगावातून, फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरून. सन्मित्र बँक मुगभाट मध्ये तर सारस्वत बँक निकदवरी लेन मध्ये. 

माझे वडिलांनी वकिलाकडे नोकरी करून शिवाय सन्मित्र बँकेच्या अडचणीच्या काळात 14 वर्ष मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून  काम केले होते. त्या वेळी सन्मित्र बँकेत फार चांगली, निस्पृह, समाजाला पुढे आणावे अशी श्रद्धा असलेली मंडळी काम करीत होती. हळुहळु नवीन मंडळी त्यात येऊ लागली. जुने आणि नवे यांच्यात थोडाफार विचारात किंवा बँक कशी चालवायची या बाबतीत फरक होऊ लागला आणि हळूहळू जुनी मंडळी वायोपरत्वे बाहेर पडली. 

माझे वडिलांचे त्यावेळच्या सारस्वत बँकेच्या उच्चपदस्थ तसेच डायरेक्टर मंडळींशी वैयक्तिक सम्बन्ध होते. या मंडळींचे शिक्षण आणि त्यांचे व्यवसाय खरोखरच मोठे आणि नावाजलेले (outstanding) होते. त्यातील काही ठळक नावे म्हणजे कै. विजयालक्ष्मी पंडित यांचे दिर कै. वसंतराव पंडित, चंद्रकांत वर्दे शेयरब्रोकर, डॉ. पी. डब्ल्यू. रेगे हे कायद्यांत पीएचडी आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल वगैरे. चांगले काम करून त्यांनी त्यांच्या समाजाचा आणि इतर समाजाचा विश्वास संपादन केला आणि बँकेचा व्यवसाय वाढवला. माझे वडील मला नेहमी सांगायचे, "ही सारस्वत बँक आता लहान आहे (त्यावेळी फक्त ७ किव्वा ८ शाखा) पण बघ ही एक दिवस फार पुढे जाईल. कारण जरी या मंडळींमध्ये मतभेद असले तरी समाज म्हणून हे एकसंघ आहेत". आज त्यांचे वाक्य खरे ठरत आहे.  पुढे पूर्वाश्रमीचे शिवसेना आणि आता भाजप चे  खासदार श्री. सुरेश प्रभू, सी ए, यांनी अतिशय तरुण वयात त्या बँकेचे अध्यक्ष म्हणून काम बघितले तसेच कै एकनाथ ठाकूर हे शिवसेना खासदार सुद्धा या बँकेचे अध्यक्ष होते. या सर्व मंडळीने आणि निष्ठावान कर्मचारी वर्गाने ही बँक नावारूपाला आणली त्याचे हे फलित आहे. 
माझी पहिली नोकरी सारस्वत बँक, निकदवारी लेन मधीलच. त्यामुळे मी त्या मंडळींना जवळून ओळखतो.

 याउलट सन्मित्र मधील नवीन मंडळी सुशिक्षित होती. परंतु त्यातील काही जण वेगवेगळे उद्देश घेऊन बँकेत काम करण्यासाठी आली होती. मग प्रत्येकाने आपला एक मतदारसंघ बनवून एकगठ्ठा मतदान आणण्यास सुरुवात झाली. त्या मतदारांना खुश ठेवण्यासाठी त्याना अवाजवी कर्ज किंवा बेकायदेशीर कर्ज ध्यायला सुरवात झाली. त्यात काहींनी स्वतःचे हात सुद्धा धुवून घेतले. हळूहळू ही प्रकरणे वाढत चालली. दरम्यान माझे वडील निधन पावले होते (१९७९). मी २५ वर्षाचा होतो, आणि समाजासाठी काहीतरी करावे अशी भावना मनात होती. १९८१ साली बँकेत होत असलेल्या गैर व्यवहाराची सम्पूर्ण माहिती माझ्यापद्धतीने घेऊन हा विषय माझे जेष्ठ नातेवाईक थोर समाजसेवक कै. नारायण सखाराम वीरकर, डोंबिवली  यांच्याशी बोललो. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मित्र बँकेच्या त्यावेळच्या संचालकांविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला आणि त्यामध्ये तो ठराव बहुमताने त्यांच्या विरुद्ध गेला आणि ते पाय उतार झाले. परंतु त्यानंतर नवीन आलेले संचालक सुद्धा त्याच पद्धतीने काम करू लागले आणि हळूहळू त्या बँकेची अधोगती होत गेली. याचे मुख्य कारण म्हणजे बँकेने कर्ज घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करणारे सभासद बनवले कारण अशा मतदारांकडून निवडून येण्यात त्यांना फायदा होता. ( काही ठिकाणी दोन कॅटेगरीचे सभासद असतात एक कर्ज घेणारे पण ते मतदानात भाग घेऊ शकत नाहीत, दोन जे मतदानात भाग घेऊ शकतात). त्यावेळच्या संचालकांनी गैरकृत्य केल्यामुळे सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित समाजाने सन्मित्र बँकेकडे पाठ फिरवली. शेवटी ती बँक दुसऱ्या बँकेत एकत्र होऊन सुरवातीला देवरुखे मंडळींनी, सहकार्याने उद्धार करण्यासाठी स्थापन केलेल्या सन्मित्र बँकेतील आपले अस्तित्व पूर्ण नष्ट केले. हीच गोष्ट इतर काही समाज्याच्या बँकांचे बाबतीत झाली.

जर त्यावेळी समाजाने, वाट चुकलेल्या सन्मित्र बँकेवर अंकुश ठेवून तिच्यात प्रगती घडवून आणली असती तर तिचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी झाला असता आणि आज हे चित्र पालटले  असते आणि  देवरूखे समाजाकडे एक अर्थसम्पन्न बँक राहिली असती.

असो, नवीन पिढीला हा इतिहास माहिती व्हावा आणि इतिहास आपल्याला मार्गदर्शक असतो अशी भावना ठेवून ही कटू आठवण मी सर्वांसमोर मांडली आहे. या समाजात अजूनही त्या घटनेतील काही साक्षीदार अस्तित्वात आहेत. ते ही गोष्ट नक्कीच मान्य करतील.

माधव भोळे

Sunday, July 25, 2021

त्र्यंबकेश्वर, येथील देवरूखे ज्ञातीचे तेथिल उपाध्याय (कै) श्री सदाशिव हरी सरडे गुरुजी

 एक आठवण 


एकदा मी त्र्यंबकेश्वर येथे गेलो होतो. देवरूखे ज्ञातीचे तेथिल उपाध्याय (कै) श्री सदाशिव हरी सरडे गुरुजी यांचेकडे वास्तव्याला होतो. सहज त्यांच्या स्वागत कक्षात ( ओटीवर) बसलो असता एक मोठा काळा पांढरा फोटो तेथे टांगला होता. ( आता त्यांची तीन मजली इमारत आहे त्याच्या बाजूलाच हे त्यांचे जुने घर आहे त्याच्या ओटीवर). 

नीट निरखून पाहिले तर फोटोच्या मध्यभागी स्वतः (कै) सदाशिव हरी सरडे गुरुजी ( सध्याच्या गुरुजींचे पिताश्री ज्यांना मी भेटलो त्या वेळी ते अतिशय वयस्कर होते), त्यांच्या बाजूला आमचे भाईबंद वेदशास्त्र संपन्न कै. दत्तात्रय श्रीधर भोळे तसेच ज्ञातीतील बरेच प्रतिष्ठित व्यक्ती, त्या पैकी मी ओळखत असलेले कै परशुराम भाऊ महाजन ( धनी माधवाश्रम), कै शंकर नारायण कानडे ( श्रीनिवास कानडेचे पिताश्री ) आणि जवळजवळ 20-25 देवरूखे मंडळी. 

मी त्या सरडे आजोबांना विचारले की हा फोटो आपण इथे लावण्याचे काय कारण? ते म्हणाले आता जे घर आहे त्या जागी आमचे एक पिढीजात घर होते. एकदा गोदावरी नदीला ( जीचा उगम त्रंबकेश्वर येथून होतो) खूप मोठा पूर आला होता आणि त्यात अमचे ते पूर्वापार घर पूर्ण वाहून गेले. त्यावेळी वे. शा. संपन्न दत्तात्रय श्रीधर भोळे यांनी ७ दिवस मुंबईत भागवत सप्ताह केला आणि त्याला सर्व देवरूखे मंडळींनी प्रतिसाद देऊन मला खूप आर्थिक आणि इतर मदत केली आणि त्यामुळेच आज हे घर उभे आहे. ज्या मंडळींनी त्यात पुढाकार घेतला हा त्यांचा फोटो आहे. देवरूखे ज्ञातीचे माझ्या कुटूंबियांवर खूप उपकार आहेत,  हे मी कधीच विसरू शकणार नाही.

मला फार आनंद झाला की अशा कठीण प्रसंगी आपली ज्ञाती कोणाला तरी उपयोगी आली आणि त्याचे नेतृत्व माझ्या एका भाईबंदाने केले. लोक त्यांना दत्तूशास्त्री भोळे म्हणत. ते गिरगावातील कोळीवाडी मध्ये आमच्या पिताश्रींची खोली ज्या इमारतीत आहे त्याच इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर रहात असत. अतिशय विद्वान आणि स्पस्ट वक्ते. ह्यांचे मूळ गाव वीर होते आणि आमच्या घराजवळच त्यांचा घरवंद आहे. ( दुसरे सुद्धा एक दत्तूशास्त्री भोळे होते ते सुद्धा गिरगावात अनंत ऋषींचे वाडी रहात होते आणि तेथील श्री रामाच्या देवळात पुजारी होते त्यांना टोपण नाव गोरा दत्तू असे होते. ते वेगळे).

देवरूख्यांची पहिली वेद शाळा सुद्धा वीर येथे आमच्याच जमिनीत असलेल्या घरात स्थापन झाली आणि ज्ञातीतील अनेक वैदिक ब्राह्मण पूर्वी वीर मधून शिकून गेले याचा मला अभिमान आहे.

डिक्शनरी वाले वीरकर तर सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

माधव भोळे