श्री राम गणेश तथा रामभाऊ निमकर ( दुःखद निधन).
श्री राम गणेश तथा रामभाऊ निमकर यांना देवरुखे समाजात ओळखत नाही असा माणूस विरळाच. एकेकाळी देवरुखे ब्राह्मण विध्यार्थी साहाय्यक संस्था म्हणजे रामभाऊ असे समीकरणच होते.
१९६९ सालच्या विध्यार्थी साहाय्यक संस्थेच्या हीरक महोत्सवात “रमेश मित्र मंडळ” आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर रामभाऊंनी देवऋख्यांच्या सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. रामभाऊ हिंदी मध्ये एम. ए. आणि हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीची रत्न हि पदवी प्राप्त होते, तसेच ते विला तेरेसा, पेडर रोड, मुंबई या कॉन्व्हेंट शाळेत हिंदी, मराठी आणि इतर विषय शिकवत. मराठीवर प्रभुत्व आणि समाजकार्याची आवड असल्यामुळे सहाजिकच त्यावेळच्या संस्थेच्या उच्चपदस्थानी त्यांना हेरले आणि पुढे विध्यार्थी साहाय्यक संस्थेचे चिटणीस म्हणून बाळासाहेब तथा गो. भा. कुळकर्णी यांचेबरोबर ते सहचिटणीस म्हणून काम करू लागले. १९७६ साली झालेल्या शैक्षणिक संस्थांच्या विलीनीकरणामध्ये रामभाऊंचा मोलाचा वाटा आहे.
माझा आणि त्यांचा सामाजिक परिचय १९७९-८० दरम्यान संस्थेच्या विध्यार्थी पुस्तक पेढी मुळे आला. सुरवातीपासूनच विध्यार्थी पुस्तक पेढीला रामभाऊंनी भरपूर सहकार्य केले. १९८४ साली कै लक्ष्मणराव भोळे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या अमृत महोत्सवात रामभाऊंनी बाळासाहेबांच्या आणि लक्ष्मणरावांच्या खांद्याला खांदा लावून अतिशय जोमाने काम केले. २५.०६.२००५ पासून रामभाऊंनी विध्यार्थी साहाय्यक संस्थेच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.
३६ वर्ष सलग काम करून सुद्धा त्यांनी कोणत्याही पदाचा कधीही हट्ट केला नाही आणि जी जबाबदारी वाट्याला येईल ती मिटल्या ओठाने, हसऱ्या चेहऱ्याने, सक्षमपणे सांभाळली. ते नेहमी म्हणत कि असे काम केले नाही तर संस्थेची घडी टिकून रहाणार नाही. त्यांनी सन्मित्र सहकारी बँकेमध्ये सुद्धा एक वर्ष निर्देशक म्हणून काम केले आहे. शिवाय डोंबिवली येथे २००० साली झालेल्या जागतिक परिषदेमध्ये त्यांनी यथोचित काम केले आहे.
२००७ नन्तर त्यांनी हळूहळू विद्यार्थी सहायक संस्थेमधून निवृत्ती घेतली. परंतु त्यांचे सामाजिक काम केलेले मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांचे मित्रवर्य बाळासाहेब यांच्या निधनानंतर, बाळासाहेब सांभाळत असलेल्या "देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी", "देवरुखे ब्राम्हण शिक्षण फ़ंड" या संस्थांची धुरा त्यांनी अंगावर घेतली. २३ जानेवारी २०११ रोजी झालेल्या “देवरुखे ब्राम्हण अनाथ कौटुंबिक निधी” च्या हीरक महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामगिरीतून संस्थेला खर्च वजा जाता रुपये १५ लाख एवढी भरघोस रक्कम त्यांनी मिळवून दिली तसेच तो कार्यक्रम "देवरुखे युवा" यांच्या बरोबर करून सहकाराचा एक नवा पायंडा समाजात पाडला.
हे सर्व करीत असताना आपला मूळगाव कुडली येथे सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली. १९७२ साली कुडली येथील श्री लक्ष्मी नारायण देवस्थानाच्या न्यासाचा झालेल्या शतक महोत्सवात महत्वाची भूमिका बजावून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यानी मूळ निधीत मोलाची भर घातली तसेच तरुण पिढीला आकर्षित करून होणार वार्षिक कार्तिक महोत्सव बहरास आणला. त्यामुळे त्यांना सुद्धा देवकार्यात गोडी निर्माण झाली.
१९७८ साली कुडली येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने "कुडली विकास मंडळ" स्थापन करून त्याद्वारे कुडलीचा रस्ते, वीज, पाणी या दैनंदिन विकासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयास केला आणि त्याबाबतीत बरेच यश मिळवले. कुडली बद्दल त्यांना मनपूर्वक आस्था होती
ऐन तारुण्यात आलेल्या शारीरिक अडचणीवर मात करून प्रपंच्याच्या रहाटगाडग्यात सकाळी ७ ते रात्री ९ वाजे पर्यंत विद्यादानाचे काम करित, रात्री १० ते ११.३० दररोज बाळासाहेबांबरोबर विद्यार्थी साहाय्यक संस्थेत काम करून आपली समाजाप्रती असलेली सद्भावना आणि सामाजिक ऋण फेडत रामभाऊंनि आपली कारकीर्द उज्वल केली. आधीच नावारूपास असलेली विध्यार्थी सहायक संस्था या जोडगोळीने आणखी एका उंच स्तरावर नेऊन ठेवली. त्या दोघांचा लोकसंग्रह अतिशय दांडगा होता.
त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी "कै. अंजली निमकर" यांची सुयोग्य साथ लाभली. त्यांच्या निगर्वी आणि समंजस स्वभावामुळे त्यांनी समाजात अनेक माणसे जोडली. ते नेहमी मला सांगत “माधव सामाजिक कार्य म्हटले म्हणजे तोंडात साखर, डोक्यावर बर्फाची लादी ठेवली तरच चांगले काम हातून घडेल”. वयाची ८५ ओलांडल्यानंतर ते शारीरिक अडचणींमुळे काम करू शकत नाही याची त्यांना खन्त वाटे, परंतु कोणी माणूस भेटायला गेला कि ते या सर्व संस्थांची आपुलकीने विचारपूस करत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत.
दिनांक १४ मे २०२० सकाळी ७ वाजता वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत वृद्धापकाळामुळे मावळली. त्यांचे पश्चात त्यांचा सुपुत्र संतोष, स्नुषा कविता आणि 3 विवाहित मुली तसेच नातवंड असा मोठा परिवार आहे.
देव त्यांच्या आत्म्यास सदगती देवो. त्यांनी केलेले सामाजीक कार्य या पेक्षा जोमाने सुरू रहावे हीच त्याना खरी श्रद्धांजली होईल.
माधव भोळे.
मोबाईल 98194 79791